राज्यात एका पदाधिकाऱ्याला मंत्रिपद आणि केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे , आठवले म्हणतात महायुतीचा प्रचार करा
भाजपा, शिवसेना, आरपीआय या महायुतीच्या प्रचाराला लागा, नाराजी बाजूला सारा असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. सांताक्रूझ पूर्व कालिना येथील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइं च्या राज्यकमिटी च्या महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.विचारमंचावर अध्यक्षस्थानी अविनाश महातेकर; सूत्रसंचालन राज्य सरचिटणीस राजा सरवदे;काकासाहेब खंबाळकर; माजी आमदार अनिल गोंडाने; दिपकभाऊ निकाळजे; पप्पू कागदे; जगदीश गायकवाड; गौतम सोनवणे; ऍड. मंदार जोशी; दयाळ बहादूरे; अण्णा रोकडे; ऍड. आशाताई लांडगे; फुलाबाई सोनवणे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यात एका पदाधिकाऱ्याला मंत्रिपद मिळणार आहे तसेच केंद्र सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे.त्यामुळे कोणताही आततायी निर्णय न घेता सर्व राज्यात भाजप शिवसेना आरपीआय महायुती च्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामानीकपणे काम करण्याचा ठराव आज रिपब्लिक पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आला. तसेच जे कार्यकर्ते पक्षाच्या अधिकृत आदेशाविरुद्ध काम करतील त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येईल असा इशारा ना रामदास आठवले यांनी आजच्या बैठकीत दिला.