शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळीची पिढी बरबाद केली म्हणून आमचा राग : आनंदराज आंबेडकर
चुकीच्या नेत्याला पुढे आणून शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बरबाद केली आहे. त्यामुळंच प्रकाश आंबेडकर यांचा पवारांवर राग आहे, अशी टीका रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी पंढरपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
आनंदराज यांनी यावेळी पवारांवर हल्लाबोल केला. ‘शरद पवार यांनी चुकीच्या नेत्याला पुढं आणलं. या नेत्यामुळं आंबेडकरी चळवळीचे ३० ते ४० वर्षांचे राजकारण फुकट गेले आणि आज तो नेता स्वत:ही पवारांच्या सोबत नाही,’ असं आनंदराज म्हणाले. त्यांचा रोख रामदास आठवले यांच्याकडं होता. मात्र, त्यांनी थेट नामोल्लेख टाळला.
‘सोलापूरमध्ये काल झालेली शरद पवार यांची सभा केविलवाणी होती. ज्या सेनापतीनं रिंगणातून पळ काढला त्याच्याबाबत आपणास काहीच बोलायचं नाही, असा टोला त्यांनी पवार यांना हाणला. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची ‘बी’ टीम नसून काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम आहे. उत्तर प्रदेशात हे सिद्ध झालंय,’ असंही ते म्हणाले.