नेपाळच्या दक्षिणी जिल्ह्याला अतिवृष्टी आणि वादळाचा जबरदस्त तडाखा : २५ ठार, ४०० जखमी
नेपाळच्या दक्षिणी जिल्ह्याला जबरदस्त वादळाचा तडाखा बसला आहे. या वादळामुळे २५ जण मृत्यूमुखी पडले असून ४०० जण जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळच्या सुमारास दक्षिण नेपाळच्या बारा आणि पारसा जिल्ह्यातील खेड्यांमध्ये हे वादळ धडकले. या वादळासोबत संततधार पावसाने दक्षिण नेपाळला रात्रभर झोडपले. या भागातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या वादळात आतापर्यंत २५ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती नेपाळ प्रशासनाने दिली आहे. हा आकडा अधिक मोठाही असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान बचाव कार्य वेगाने सुरू असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतं आहे.