Loksabha 2019 : नरेंद्र मोदींना दिले सुप्रिया सुळे यांनी उत्तर !! मोदी एकटेच आहेत….
वर्ध्यातील सभेतून पतंप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेली वैयक्तीक टीका राष्ट्रवादीने गंभीरतेने घेतली आहे. यामुळे मोदींच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींना कौटुंबीक संबंधांचा अनुभव नाही. त्यामुळे ते शरद पवारांबद्दल असं बोलले, असं खरमरीत प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिलंय. तर वर्ध्यातील मोदींची आजची सभा सुपर फ्लॉप ठरली, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये मोदींनी काहीच कामं केली नाहीत. तसंच शरद पवारांवर टीका करत नाही तोपर्यंत प्रसार माध्यमांमध्ये हेडलाइन होत नाही. मोदी एकटेच आहेत. मोदींना कौटुंबीक संबंधांचा अनुभव नाही. म्हणूनच ते पवारांबद्दल असं बोलले, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. पण मोदींनी शेतकऱ्यांसाठी काय केले?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय.
वर्धामधील सभेतल्या कमी गर्दीमुळे मोदींचा आणि भाजपाचा माथा भडकला असावा. कमी गर्दीमुळे मोदी आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पवार कुटुंबाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठांच्या अवस्थेकडे पाहा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली ५ वर्षे दररोज जनतेला ‘एप्रिल फूल’ बनवत आलेत. मात्र, आज वर्ध्यातील मोदींच्या जाहीरसभेकडे पाठ फिरवून विदर्भातील जनतेने मोदींना ‘एप्रिल फूल’ केले आहे. मोदींची वर्ध्यातील आजची सभा सुपर फ्लॉप ठरली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय.
पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत. कारण त्यांना माहीत आहे हवेची दिशा कोणत्या दिशेला आहे. शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता खूप मोठे कौटुंबीक युद्ध सुरू झाले आहे. शरद पवार यांची पक्षावरील पकड आता सुटत चालली आहे. आता हळूहळू पवार यांचा पुतण्या पक्ष आपल्या ताब्यात घेऊ पाहात आहे, असं मोदी म्हणाले.