अहमदनगर जिल्ह्यात ‘ऑनर किलींग’ , मुलाच्या मोटारसायकल फिरते म्हणून वडिलांनीच केला मुलीचा खून …
मुलीच्या प्रेमप्रकरणाचा संशय आल्यानंतर वडिलांनी तिचा गळा आवळून खून करून तिच्या मामांच्या मदतीने मृतदेह जाळून टाकल्याची घटना कर्जत तालुक्यातील चौंडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीचे मामा व वडिलांसह एकूण तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
आरती सायगुंडे (वय १७ , चापडगाव, ता. कर्जत) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी कि , आरतीचे वडील पांडुरंग श्रीरंग सायगुंडे, व तिचे मामा राजेंद्र जगन्नाथ शिंदे, ज्ञानदेव जगन्नाथ शिंदे ( दोघे राहणार, निमगाव डाकू, ता कर्जत) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. कर्जत तालुक्यातील चौंडी येथे आठ दिवसांपूर्वी बेपत्ता तरुणीची झालेली ही हत्या ‘ऑनर किलींग’चा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. फिर्यादी वडिलांनीच मुलीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत आरती येथील महाविद्यालयात शिकत होती. कॉलेजला जाता-येता मुलांबरोबर गाडीवर बसून जाते, सांगितलेले ऐकत नाही, जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देते म्हणून पांडुरंग सायगुंडे यांच्या मनात मुलीविषयी राग होता.
गेल्या शनिवारी आरती ही चापडगाव येथील कॉलेजवरून आपल्या घरी येत असताना तिला वडिलांनी दुसऱ्याच्या मोटारसायकलवर बसून येत असताना मलठण रोडला पाहिले. या बाबत सायंकाळी आरतीकडे चौकशी केली असता ती खोटे बोलत असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. या वेळी दोघांमध्ये भांडण होऊन वडिलांनी तिचा रागाच्या भरात गळा दाबून खून केला. या नंतर मुलीचा मृतदेह घरातच ठेवून त्यांनी त्याच दिवशी जामखेड पोलीस स्टेशनला जाऊन आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या नंतर रात्री मुलीच्या मामास घरी बोलावून घेऊन घडलेला प्रकार सांगितला व कोणासही याबाबत सांगू नका असे सांगितले. या नंतर दुसऱ्या दिवशी दोन मामांच्या मदतीने मुलीचे प्रेत घरापासून ७००—८०० फुटावर असलेल्या शेततलावाच्या परिसरात नेऊन जाळून टाकले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तब्बल चार पाच दिवसांनी आरतीच्या बहिणींना मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. आरतीची हत्या ‘ऑनर किलींग’चा प्रकार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरतीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तब्बल ३५ संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.