लोकसभा २०१९ : लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला मतदान करु नका, अन्यथा पुन्हा निवडणुका होणार नाहीत : सिनेलोक
आपल्या देशाच्या राज्यघटनेपुढे अलीकडच्या काळात मोठे संकट उभे ठाकले आहे. देशावर सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षातर्फे संविधानाची वेळोवेळी पायमल्ली केली जात आहे. हे वेळीच थांबावायचे असेल आणि संविधानाचा सन्मान अबाधित ठेवायचा असेल तर, भाजपला येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतं देऊ नका, भाजपला निवडून देऊ नका; असे जाहीर आवाहनच देशभरातील निर्माते-दिग्दर्शकांनी नागरिकांना केले आहे.
लोकशाहीसाठी अतिशय कठीण काळ
लोकांनी भाजपला मतं का देऊ नयेत, हे सविस्तरपणे स्पष्ट करणारी ऑनलाइन पत्रकाची मोहीमच कला क्षेत्रातील अनेकांनी उघडली असून, त्यात देशभरातील सुमारे १०० हून अधिक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. ‘देशाच्या संविधानाचा सन्मान राखणाऱ्या पक्षाला निवडून द्या. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या भाजपला मतं देऊ नका. हा लोकशाहीसाठी अतिशय कठीण काळ आहे. लोकशाही वाचवा,’ अशा आशयाच्या या मोहिमेत दिग्दर्शक आनंद पटवर्धन, अंजली मोंटेरिओ, सनलकुमार शाशिधरन, दीपा धनराज, पुष्पेंद्र सिंह, प्रदीप नायर असे अनेकजण सहभागी आहेत.
भाजप आणि संघ राष्ट्रवादी नाही.
या विषयी आनंद पटवर्धन म्हणाले, ‘येत्या निवडणुकांत जर भाजपला पुन्हा निवडून दिले तर, पुढच्या निवडणुका होतील की नाही, याविषयी खात्री बाळगता येणार नाही. ही वेळ येऊ द्यायची नसेल तर, आत्ताच खबरदारी बाळगली पाहिजे. ही आपल्याला शेवटची संधी आहे. भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे स्वतःला राष्ट्रवादी म्हणवत असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी देशासाठी काहीही केलेले नाही.’
एकात्मतेला बाधा पोहोचविणारी
विचारधारा रोखा
‘लोकशाही वाचवा’ या मोहिमेअंतर्गत निर्माते-दिग्दर्शकांनी असे म्हटले आहे की, जो पक्ष लोकशाही मूल्यांचा सन्मान राखेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यास कटिबद्ध असेल, सेन्सॉरशिप चा वापर दबावतंत्र म्हणून करणार नाही, अशा पक्षाला येत्या निवडणुकीत निवडून दिले पाहिजे. ‘आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या भले भिन्नभिन्न असलो तरी, आम्ही नेहमीच एकजुटीने राहिलो आहोत. एक राष्ट्र म्हणून जगत आलो आहोत. या एकात्मतेला बाधा पोचवेल अशा पक्षाला मत द्यायला नको,’ असेही यात म्हटले आहे.