Uddhav Thakare : पुन्हा सत्ता आल्यास राममंदिराचा प्रश्न मार्गी लावू , शरद पवारांना भाजपामध्ये घेऊ नकाः उद्धव ठाकरे
कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीसाठी युतीची पहिली जाहीरसभा घेत भाजप-शिवसेनेने प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. सातारामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयनराजे भोसलेंविरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मुंबईत अरबी महासागर, कोल्हापुरात जनतेचा महासागर लोटला आहे. या गर्दीने लोकसभा निवडणुकीचा निकाल दिला आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले कोल्हापूर हे शक्तीपीठ आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक चळवळ सुरू केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात देशात परिवर्तन झाले आहे. ५६ पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही. देश चालविण्यासाठी ५६ इंचाची छाती आवश्यक आहे. भाजप, शिवसेना युती म्हणजे फेविकॉलचा मजबूत जोड आहे. त्याला कुणी तोडू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या कालावधीत केवळ काँग्रेसच्या नेत्यांचीच गरीबी हटली. सामान्य माणूस खितपत पडला. भाजप, शिवसेनेची युती विचारांची आहे, ही हिंदुत्वादी विचारांची युती आहे. हिंदुत्ववाद जाती, धर्माच्या पलीकडील आहे. ज्यांचे मातृभूमीवर प्रेम आहे, त्या प्रत्येकाला सोबत घेऊन हिंदुत्व चालतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्रजी कृपा करून शरद पवारांना भाजपामध्ये घेऊ नकाः उद्धव ठाकरे
आज दुपारी मी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आता मी तीचचं विराट रूप इथे पाहतोय. आम्हाला सत्ता पाहिजे. गोरगरीब जनतेचे भले करण्यासाठी खुर्ची पाहीजे. देव, देश आणि धर्मासाठी युतीची गरज आहे. राममंदिराचा प्रश्न प्रलंबित होता. पुन्हा सत्ता आल्यास राममंदिराचा प्रश्न मार्गी लावू. जो धर्म आम्हाला गाडगेबाबांनी सांगितला. मानवतावाद धर्मासाठी आम्ही युती केली आहे. अनेक गोष्टींसाठी आम्ही युती केली आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. पाकिस्तानमध्ये क्रिकेटपटू पंतप्रधान होतो. तर इकडे पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणारे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं नाव न घेता केली. समोर शिल्लक कोण राहलयं हेच आता कळत नाही, म्हणुन देवेंद्रजी कृपा करुन शरद पवारांना भाजपामध्ये घेऊ नका. विरोधीपक्ष सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागतात. शरद पवार म्हणाले की हल्ला करण्याचा सल्ला मी दिला होता. तोच हल्ल्याचा पुरावा आहे. त्यांनी सांगावे नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान आहेत, ते त्यांनी जाहीर करावे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सदाभाऊ तुमची तोफ मला हातकणंगलेमध्ये पाहीजे. यावेळी दोन्ही ठिकाणी भगवा फडकला पाहीजे. हा भगवा लोकसभा आणि विधानसभेत फडकला पाहिजे, असं अवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. राष्ट्रवादीला मत देणार असाल, तर अजित पवार धरणं कशी भरतात हे आठवा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजप-सेना युतीचे कोल्हापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन
भाजप-शिवसेना युतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप-सेना युतीने कोल्हापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करून निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग रविवारी फुंकले. येथील तपोवन मैदानावर सायंकाळी सहाच्या सुमारास सभेची सुरुवात झाली. या सभेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, दुग्धविकास, पशुपालनमंत्री महादेव जानकर, यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील युतीचे लोकसभा उमेदवार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. गळ्यात पक्षाचे स्कार्फ घालून, भगवे ध्वज घेऊन भाजप, सेनेचे कार्यकर्ते या सभेसाठी आले होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या परंपरेनुसार लोकसभा प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून व्हावा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली आणि फडणवीस यांनी ती मान्य केली. त्यानुसार सभा झाली.