किरकोळ कारणावरून पत्नीचा गळा आवळून खून, पती स्वत:हून पोलिसात…
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून माहेरी निघालेल्या पत्नीचा रस्त्यावर नायलॉन दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी इथं घडली आहे. मंगल रमेश गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. तर पती रमेश गणपती गायकवाड हा स्वत: कुरूंदवाड पोलिसांत हजर झाला असून, त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.
या विषयी पोलिसांनी सांगितले की, रमेश रात्रपाळीचे काम करून सकाळी साडे अकरा वाजता घरी आला होता. उपवास असल्याने फराळासाठी पत्नीला खिचडी करण्यास सांगितले. यावरुन दोघांमध्ये भांडण झाले होते. चहा करून देण्यावरून पुन्हा भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून मंगल गायकवाड ही माहेरी जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती.
खिद्रापूर-सैनिक टाकळी रस्त्यावरील बस थांब्याजवळ मंगल थांबली होती. रमेश हा तिला बोलविण्यासाठी थांब्याजवळ गेला असता, या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात रमेशने सोबत आणलेल्या नायलॉनच्या दोरीने गळा आवळून मंगलचा खून केला.
पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने हत्येची कबुली दिली. दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांनी खुनात वापरलेली दोरी, पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपड्याची पिशवी जप्त केली आहे.