लोकसभा २०१९ : लातूर, अहमदनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची नाराजी
सेना-भाजप युती मध्ये भाजप महाराष्ट्रात २५ जागा लढवणार आहे. त्यापैकी भाजपने १६ जणांची उमेदवारी जाहीर केली असून उर्वरित ९ जागांची कार्यकर्त्यांना प्रतिक्षा आहे. घोषित उमेदवारांपैकी केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. यात लातूरमध्ये सुधाकरराव शृंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या १४ जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.
ईशान्य मुंबई – किरीट सोमय्या दिंडोरी – हरिश्चंद्र चव्हाण सोलापूर – शरद बनसोडे जळगाव – अशोक पाटील यांचा निकाल दुसऱ्या यादीत लागण्याची शक्यता आहे.
भाजप मुंबईतील सहापैकी तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र किरीट सोमय्या खासदार असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर जागांवरील उमेदवारांची घोषणा झाली. शिवसेनेकडून सोमय्यांच्या नावाला विरोध असल्यामुळे सोमय्यांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे. मात्र त्यांच्या नावात बदल करणे कठिण आहे.
सोलापुरात सुशीलकुमार शिंदे, बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोणते उमेदवार द्यायचे, याबाबत अद्याप भाजपचा निर्णय झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून माढ्याचा तिढा सुटत नसल्यामुळे भाजप विचारपूर्वक निर्णय घेताना दिसत आहे.
भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. सुजय विखे यांच्या भाजपप्रवेशानंतर नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणं निश्चित मानलं जात होतं. मात्र लातूरमधून विद्यमान खासदार सुनील गायकवाडांना दुसरी संधी नाकारली जाईल याची शक्यता नव्हती . पक्षाच्या या निर्णयामुळे गायकवाड यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे वडवळ-नागनाथ गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. पालकमंत्री संभाजी पाटील – निलंगेकर यांच्या ते जवळचे आहेत म्हणून त्यांची वर्णी लागल्याची चर्चा आहे.