भाई, भाई म्हणत ते अंत्ययात्रेत घुसले आणि खिशांवर मारला हात…१३ अटकेत
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्ययात्रेत ३२ लोकांचे खिसे कापले गेल्याचे गुन्हे पणजी पोलिसात नोंदविण्यात आले आहेत. त्यातील १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे बहुतेक सर्वच खिसेकापू हे गोव्याबाहेरील होते. अंत्ययात्रेला पांढऱ्या वेशात जाण्याची पद्धत आहे. सर्व खिसेकापू पांढरा शर्ट घालूनच आले होते. भाई भाई करीत गर्दीत मिसळले आणि त्याच गर्दीत लोकांच्या खिशातील पाकिटे चोरली. १३ जणांना पाकीटे मारतानाच लोकांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
एका खिसेकापूने तर दोघा जणांची पाकीटे चोरली होती व तिसरे चोरताना तो पकडला गेला. १३ पकडले गेले असले तरी असे कितीतरी निसटलेही असल्याचे सांगण्यात येत आहे.