सीएसएमटी दुर्घटनेनंतर मुंबईतील १५७ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल चांगला असल्याचा अहवाल देणाऱ्या डी. डी. देसाई असोसिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टन्स अँड अॅनालिस्ट कंपनीला मुंबई महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पूल पडल्याने जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई तुमच्याकडून का घेतली जाऊ नये? तुम्हाला काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये? असेही प्रश्न या नोटीशीत विचारण्यात आले आहेत. तसेच कंपनीने या नोटीशीला पंधरा दिवसात उत्तर द्यावं असंही महापालिकेने म्हटलं आहे. बैल गेला आणि झोपा केला अशी महापालिकेची अवस्था झाली आहे.
गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पूल कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनावर कडाडून टीका होते आहे. पूल कोसळला त्यानंतर हा पूल महापालिकेच्या अखत्यारीत होता की रेल्वेच्या अखत्यारीत याचाही वाद रंगला होता. आता मुंबई महापालिकेने हा पूल चांगला असल्याचा अहवाल देणाऱ्या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या दुर्घटनेनंतर सीएसएमटी पुलासह मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांमधील १५७ पुलांचे पुनसर्वेक्षण करण्यात येतं आहे. १५७ पुलांमध्ये विविध प्रकारच्या पुलांचा समावेश आहे. या सगळ्या पुलांच्या बांधकामाचे नव्याने निरीक्षण करण्यात येऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सी. व्ही. कंद कन्सल्टंट कंपनीला हे काम दिले आहे अशीही माहिती समोर आली आहे.