औरंगाबाद लोकसभा कोळसे पाटीलच आमचे उमेदवार : प्रकाश आंबेडकर
आम्ही काॅंग्रेसला वेळ देऊनही त्यांनी वेळेत निर्णय न घेतल्याने आम्हाला आमचे २२ उमेदवार घोषित करावे लागले त्यामुळे त्या २२ जागांवर आता कुठलीही तडजोड होणार नाही अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे.
औरंगाबादला वंचित आघाडीतर्फे न्यायमूर्ती बी. जी . कोळसे पाटील यांचे नाव जाहीर झालेले असताना आता एमआयएमतर्फे या जागेची मागणी होते आहे या वादावर बोलताना ते म्हणाले की, ” औरंगाबादमध्ये कोळसे पाटील यांच्या ऐवजी एमआयएमचे इम्तियाज जलील यांना उमेदवारी द्या, अशी मागणी पुढे आली आहे. यात फूट पडण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तो प्रयत्न यशस्वी होणार नाही. ओवेसी आणि मी बसून त्याचा निर्णय घेऊ. ”
वंचित आघाडीच्या निमित्ताने विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत आंबेडकर म्हणाले,” माझ्यावर अनेकजण आरोप करत आहेत. त्यांचं पितळ उघडं करायची वेळ येऊ देऊ नका. जे आरोप करत आहेत. त्यांचे आरएसएस सोबत कसे लागेबांधे आहेत हे मी दाखवून देईन . मी सेनेसोबत जायचं की भाजप की आरएसएस सोबत हे मी ठरवेल. तो निर्णय घेण्यास मी सक्षम आहे. माझं मालक होण्याचा कोणी प्रयत्न करू नका.”