India vs Australia : विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताचा पराभव
रांची येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताला ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३१३ धावा केल्या आणि या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे तीन तेरा वाजले. कोहलीने १२३ धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
दमदार सलामीनंतरही ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३१३ धावा करता आल्या. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीचा चांगलाच फायदा ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी उचलला. आरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी १९३ धावांची सलामी दिली. पण कुलदीप यादवने फिंचला बाद करत ही जोडी फोडली. फिंचने १० चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ९३ धावा केल्या. फिंचचे शतक हुकले असले तरी ख्वाजाने मात्र शतक पूर्ण केले. फिंचने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०४ धावा केल्या. शतक झळकावल्यावर ख्वाजाला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. ख्वाजानंतर ग्लेन मॅक्सवेलचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे जवळपास दोनशे धावांची भागीदारी ३२ षटकांमध्ये होऊनही ऑस्ट्रेलियाने ३१३ धावांपर्यंतच मजल मारली.