जालना : “अर्जुनाचा बाण” अद्याप तरी “भात्या”तच…!
“अर्जुनाचा बाण” अद्याप तरी “भात्या”तच…!
काहीही झाले तरी जालना लोकसभा लढणारच ! असा “बाण” सोडणा-या सेनेच्या अर्जुनाचा “बाण” दानवेंच्या “कमळा”चा वेध घेणार कि, कमळ फुलवणार ? अशा चर्चा जालन्याच्या शोला चौकात आणि संपूर्ण मतदार संघात चालू असतानाच एकमेकांना पाण्यात पाहणारे
भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे आमदार राज्यमंत्री अर्जुन खोतकर आज एकाच व्यासपीठावर पहायला मिळाल्याने आणि हसतमुखाने एकमेकांना आलिंगन दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
निमित्त होते आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबाराचे.
यावेळी हे दोघेही एकाच व्यासपीठावर आल्याने ते काय बोलणार याची सर्वानाच उत्सुकता होती. मात्र, खोतकरांनी पूर्णतः शासकीय भाषण केले. तर खोतकरांच्या उपस्थितीचा फायदा घेत खा. दानवे यांनी आपल्या वतीने दिलजमाईचे संकेत दिले. विषय विकासाचा असू द्या की, जिल्ह्याचा कोणताही प्रश्न असू द्या , आम्ही सोबत येऊन तो सोडवत असतो आणि हीच परंपरा आम्ही पुढे ही कायम ठेऊ,असे म्हणत दनवेंनी आपल्या भाषणातूत दिलजमाईचे संकेत दिले.
हा तर शासकीय कार्यक्रम – खोतकर
दरम्यान, खोतकरांनी मात्र हा शासकीय कार्यक्रम असल्याने एकत्र आलोय. माझी भूमिका मी 2 दिवसात स्पष्ट करेल. उद्धव ठाकरेंशी भेट झालेली असून त्यांनी पुढची वेळ दिली आहे. मुख्यमंत्र्यांशीही माझं बोलणं झालं असून त्यांनी मला जालन्यातच थांबण्यास सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ उद्या भेटायला येण्याची शक्यताही खोतकरांनी व्यक्त केल्याने ते संभ्रमावस्थेत असल्याचे स्पष्ट दिसून आले.