IAF Air Strike: कोणत्याही राजकीय पक्षाने जवानांच्या शौर्याचे श्रेय कामा नये- उद्धव ठाकरे
वायुदलाच्या १२ लढाऊ मिराज विमानांनी २१ मिनिटे पाकिस्तानात शिरून जैश ए मोहम्मदचा अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त करून ३५० अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या या कामगिरीचे मी कौतुक करतो. मात्र जवानांच्या शौर्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षांनी घेऊ नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रात्री प्रभादेवी येथे केले. तसेच आपला वैमानिक अभिनंदन याला पाकिस्तानने जेरबंद केले. त्याची लवकर सुखरूप सुटका केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे आज सायंकाळी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
पुलवामात १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यात 40 जवान शहीद झाले . यावेळी युतीची बोलणी सुरू होती. त्यावरुन भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका झाली. यावरही उद्धव यांनी भाष्य केले. ‘युती होत नव्हती त्यावेळी टीका सुरू होती. युती झाल्यावरदेखील टीका सुरू आहे. जर युती झाली नसती, तर ५० वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसच्या हातात देश गेला असता आणि हिंदुत्व मागे पडले असते,’ असे उद्धव म्हणाले. यावेळी स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उद्धव यांनी अभिनंदन केले.