Prakash Ambedkar : वंचितांची आज मुंबईत महासभा : प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या मुंबईतील शिवाजी पार्कवर ओबीसी आरक्षण परिषदेची सभा होत असून या सभेत भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात याकडे महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या सभेला एमआयएमचे नेते बॅ . खासदार असदुद्दिन ओवेसी या सभेला उपस्थित राहणार आहेत . दरम्यान या सभेला सरकारने परवानगी देऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेसाठी मात्र शिवाजी पार्क मैदान नाकारण्यात आल्यामुळे काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय सभा आणि चर्चांना रंग आला असून महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी जाहीर सभांच्या माध्यमातून वंचितांच्या आघाडीची चर्चा सर्वत्र होत आहे . या आघाडीची मुंबईतील पहिली सभा उद्या (२३ फेब्रुवारी) शिवाजी पार्कवर होत आहे. या सभेला एक लाखांहून अधिक कार्यकर्त्यांची गर्दी होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांच्याच नजरा लागल्या असून या सभेला मिळालेली परवानगी हाही चर्चेचा विषय बनला आहे.
ओबीसी आरक्षण परिषदेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, असा विनंती अर्ज वंचित बहुजन आघाडीने सरकारकडे केला होता. या अर्जाला १६ फेब्रुवारी रोजी मंजुरी देण्यात आली. ध्वनीप्रदूषण व हायकोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्याच्या अटींवर या परिषदेला सरकारने परवानगी दिली. मात्र दुसरीकडे सरकारने १ मार्च रोजीच्या राहुल गांधी यांच्या सभेसाठी मात्र शिवाजी पार्क मैदान नाकारले. त्यामुळे राहुल यांना आता एमएमआरडीए ग्राउंडवर सभा घ्यावी लागणार आहे. याबाबत काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आम्ही शिवाजी पार्क मैदानासाठी सरकारकडे अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळला गेला. शिवसेना, भाजप, मनसे आणि आता वंचित बहुजन आघाडीलाही हे मैदान मिळाले मात्र राहुल यांच्या सभेसाठी मात्र हे मैदान सरकारने दिले नाही, असे नमूद करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन तशी चर्चाही केली. आंबेडकर यांचा पक्ष आघाडीत आल्यास चार जागा देण्याची तयारीही या पक्षांनी दर्शविली. मात्र, आंबेडकर यांना हा प्रस्ताव मान्य नाही. त्यांनी केलेली १२ जागांची मागणी आणि संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिला सून त्याचे उत्तर अद्याप न आल्याने प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वीच आपले उमेदवार घोषित केले आहेत . दरम्यान शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय लढाईचं चित्र जवळपास स्पष्ट झालं असून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे महाराष्ट्रातील राजकीय जाणत्यांचे लक्ष लागले आहे. प्रकाश आंबेडकर उद्याच्या सभेत लोकसभा निवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका विस्ताराने समोर ठेवतील, अशीही शक्यता आहे.
तरीही काँग्रेस -राष्ट्रवादीला युतीची आशा
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कुठल्याही प्रस्तवाला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसला तरी राष्ट्रवादीचे नेते स्वतः शरद पवार आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर महा आघाडीत येतील अशी अशा व्यक्त केली आहे . त्यांच्याशी संपर्क चालू असल्याचे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अजेंडा लक्षात येत नसल्याचे सांगून मतांच्या विभाजनाचा फायदा भाजपाला होऊ नये अशी आमची भूमिका असल्याने प्रकाश आंबेडकरांच्या युतीबाबत आम्ही आशादायी आहोत असे सांगितले .