सेऊल पीस प्राईजने मोदींचा गौरव : वर्षभरात भारत टॉप ५० देशांमध्ये
‘भारत लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. पुढील १५ वर्षांत भारत जगातल्या टॉप तीन अर्थव्यवस्थांच्या रांगेत जाऊन बसेल, अशी मला आशा आहे,’ असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे ते बोलत होते. भारताला जागतिक पातळीवर पुढे नेण्यासाठी मोदी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती मोदींनी यावेळी दिली. ‘भारताला पुढील १५ वर्षांत जगातल्या टॉप तीन अर्थव्यवस्थांच्या रांगेत नेऊन बसवायचे, हे आमचं उद्दिष्ट आहे. जागतिक बँकेच्या इझ ऑफ डुइंग बिझनेसच्या रँकिंगमध्ये भारत ७७ व्या स्थानी पोहोचला. आर्थिक सुधारणांमुळे पुढील वर्षभरात देश या यादीत टॉप ५० देशांमध्ये मजल मारील,’ असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. मोदींना सेऊल पीस प्राईज देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराची घोषणा ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली होती. शुक्रवारी ते द. कोरियाचे पंतप्रधान मून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अण्वस्त्रबंदीच्या मुद्द्यावर दोन्ही नेत चर्चा करणं अपेक्षित आहे.