‘समांतर’ बाबत महापौरांच्या आयुक्तांना सूचना
औरंगाबाद महापालिकेने सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील समांतर योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून शासनाला नव्या योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे; परंतु त्यापूर्वी मनपा आयुक्तांनी समांतर योजनेच्या कंपनीबरोबर चर्चा करावी, कंपनीचे म्हणणे जाणून घ्यावे, अशा सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी केल्या आहेत.
समांतर योजनेचे काम करणारी एसपीएमएल कंपनी आणि महापालिकेचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालय व लवादमध्ये सुरू आहे. मनपाने राज्य सरकारच्या प्रयत्नाने कंपनीचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु अटी मान्य होणार नसल्याचे लक्षात आल्याने कंपनीने परत जाण्याचे संकेत दिले. कंपनीने बँक गॅरंटी आणि १३५ कोटींची मागणी मनपाकडे केली आहे. या सगळ्या घडामोडीत १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत समांतर योजना रद्द करून नव्या योजनेसाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव जाण्यापूर्वी कंपनीसोबत चर्चा करावी, कंपनीचे म्हणणे, मागील इतिहास, न्यायालयातील प्रकरणे आदींची सविस्तर माहिती शासनाला द्यावी, अशी सूचना महापौरांनी मनपा आयुक्तांना केली आहे.