पाकी दहशतवादी हफिज सईदच्या संघटनेवर बंदीचा ईम्रान खानचा निर्णय
भारतातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या इशाऱ्याला गांभीर्याने घेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (NSC)ची एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन यात २००८ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची संघटना ‘जमात-उद-दावा’ आणि त्याला रसद पुरवणारी संस्था ‘फलाह-ए-इन्सानियत’ फाउंडेशनवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने माहिती दिली की एनएससीच्या बैठकीत या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी या दोन्ही संघटनांवर सरकारची नजर होती. मात्र पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा कोणत्याही प्रकारचा हात नाही, असा दावा सुरक्षा परिषदेने केला आहे.
पलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला, त्याची कल्पना, कट, अंमलबजावणी भारताच्या भूमीवर रचण्यात आला, असेही एनएससीने सांगितले. भारताने जर आक्रमक कारवाई केली तर पूर्ण शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करण्याचे आदेश पंतप्रधान इम्रान खान यांनी सैन्याला दिले आहेत.
पाकिस्तान आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या दोन्ही संघटनांचे सुमारे ५० हजार स्वयंसेवक आणि शेकडो पेड कार्यकर्ते आहेत. जमात-उद-दावा लष्कर-ए-तोयबाची प्रमुख संघटना आहे. अमेरिकेने जून २०१४ मध्ये या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केले होते. हाफिज सईद पाकिस्तानात त्याच्या घरी स्थानबद्ध होता, मात्र नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. हाफिज सईदला भारताच्या हवाली करावे अशी भारताची मागणी आहे.