वंचित बहुजन आघाडीचे आता मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन
राज्यातील प्रमुख शहरात वंचित बहुजन आघाडीच्या भव्य दिव्य सभा घेत राजकीय वातावरण ढवळून टाकणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत जंगी शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. येत्या शनिवारी २३ फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर वंचित आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ते आघाडीची राजकीय भूमिका जाहीर करतील अशी अपेक्षा असल्याने त्यांच्या या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार यात वाद नाही . आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता असताना, राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून राज्यभर सभा-मेळावे घेऊन आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती करीत आहेत.
गेल्या तीन चार महिन्यांपासून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून त्यांच्या या सभांचा दणका काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बसला आहे . त्यांनी जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ातही सत्ता संपादन मेळावे घेऊन थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली असून महत्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
एमआयएमला त्यांनी वंचित बहुजन आघाडीत घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे .
काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठक होऊनही त्यांनी मागितलेल्या १२ जागा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या त्यांच्या फॉर्म्युल्याला काँग्रेसकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांची बोलणी अर्धवट आहेत . दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी कडून त्यांना ४ जागा सोडण्याची तयारी काँग्रेस राष्टवादीने केली होती परंतु या चार जागा देण्याच्या बातमीची खिल्ली उडवून त्यांनी परभणीच्या सभेत आम्हाला ४ जागा देणारी काँग्रेस कोण ? असा सवाल करीत आम्हीच तुम्हाला ४ जागा देतो असे आव्हान दिले होते .