मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी झेरॉक्स प्रती चालणार नाहीत : मुंबई उच्च न्यायालय
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. गहाळ पुरावे आणि साक्ष यांच्या झेरॉक्स प्रती चालणार नाहीत असं उच्च न्यायालयाने सांगितल आहे. यामुळे गहाळ मुळ प्रती शोधून पुन्हा एनआयएला सादर कराव्या लागणार असून तोपर्यंत कनिष्ठ न्यायालयात खटला सुरुच राहणार आहे. २००८ मध्ये मालेगाव येथे मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणी काही पुराव्यांच्या, साक्षीदारांच्या जबाबंच्या आणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या मुळ प्रती गहाळ झाल्या होत्या. त्यांच्या झेरॉक्स प्रतींचाही पुरावे म्हणून विचार करण्यात येईल असं मत विशेष एनआयए कोर्टाने व्यक्त केलं होतं. या निर्णयाविरोधात या प्रकरणातील एक आरोपी समीर कुलकर्णी याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्या अजय गडकरी यांच्या खंडपीठाने या प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी केली.
मूळ प्रती गहाळ झाल्यानंतर झेरॉक्सच्या प्रती प्रमाण मानता येणार नाहीत असं मत उच्च न्यायालयाने मांडलं आहे. मूळ पुरावे गहाळ होणे आणि त्यावर कनिष्ठ न्यायालयाने झेरॉक्स पुरावे विचारात घेऊ असं मत मांडणे हेच मुळात चूकीचं आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाने एनआयएला फटकारलं आहे.
एनआयएने सादर करण्यात आलेले पुराव्यांचे झेरॉक्स वैध नसल्याचे उच्च न्यायालयाने सांगितल्यामुळे आता मुळ पुरावे आणि साक्षी पुन्हा एकदा कनिष्ठ न्यायालयात सादर करावे लागणार आहेत.