औरंगाबाद क्रीडा विद्यापीठातून क्रीडा विकासाला चालना : राज्यपाल
राज्यात क्रीडा क्षेत्राला रोजगाराभिमुख बनविण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे पहिले पूर्ण विकसित क्रीडा विद्यापीठ स्थापन होत आहे. यातून राज्यातील क्रीडा विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.
गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात आज काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील शहीदांना राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि उपस्थित इतर मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडूंना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास राज्यपाल यांच्यासह क्रीडा मंत्री विनोद तावडे, क्रीडा विभागाचे प्रभारी आयुक्त नरेंद्र सोपल, क्रीडा संचालक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यावेळी म्हणाले की, खेळांप्रति महत्त्वाकांक्षा, वचनबद्धता आणि निराकरण क्षमता असल्यास आपण खेळ विश्वातील सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो. पुढच्या वर्षी टोकियोमध्ये ऑलिंपिक गेम आणि पुढील दोन वर्षात आशिया गेम्स चीनमधील हुआंगझूमध्ये होणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतातील क्रीडापटूंना मेहनतीने आणि सज्जतेने सहभागी होण्याचे आवाहन राज्यापल चे. विद्यासागर राव यांनी यावेळी केले.
मंत्री श्री. तावडे यावेळी म्हणाले की, राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.