Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“कॅग”च्या क्लिनचिटमुळे भाजपात उत्साह !!

Spread the love

जेटली म्हणाले, “सत्यमेव जयते !”
खोटे ठरले राहुल गांधी

मोदी सरकारचा राफेल करार देशाला यूपीए सरकारच्या काळातील करारापेक्षा स्वस्त पडल्याचं भारताचे नियंत्रक व महालेखापालांच्या (कॅग) अहवालातून समोर आल्यामुळं भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ‘कॅग’च्या अहवालाचा आधार घेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘काँग्रेस सातत्यानं खोटं बोलत होती हे आता स्पष्ट झालं असून दिशाभूल करणाऱ्यांना आता जनताच शिक्षा देईल,’ असं जेटली यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राफेल कराराच्या बाबतीत सरकारच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयानंही समाधान व्यक्त केलं होतं. ‘कॅग’नंही तेच अधोरेखित केलंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्यानं जे खोटं बोलत होते, ते खोटंच होतं हे सिद्ध झालंय. त्यामुळं सरकारच्या निर्णयावर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत. मात्र, हे प्रकरण इथंच थांबू नये याची काळजी लोकांनी घेतली पाहिजे. दिशाभूल करणाऱ्यांना लोकांनी शिक्षा दिली पाहिजे, असं ते म्हणाले.
अनेक वर्षांपूर्वीच्या सेंट किट्स प्रकरणाचाही जेटली यांनी उल्लेख केला. ‘काँग्रेस इतिहासाची पुनरावृत्ती करू पाहत आहे. १९८९मधील राजीव गांधी यांचं सरकार भ्रष्टाचारात बरबटलेलं होतं. मात्र, त्यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी काँग्रेसनं व्ही. पी. सिंह यांच्या विरोधात सेंट किट्सचं प्रकरण उकरून काढलं होतं. मोदी सरकारची स्वच्छ प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेस पुन्हा तेच करत असल्याचं जेटली म्हणाले.
राफेल संदर्भात जेटली यांनी एक ट्विटही केलं आहे. ‘कॅग’च्या अहवालानं ‘सत्यमेव जयते’ या म्हणीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. ‘सर्वोच्च न्यायालय चुकीचं, कॅग चुकीचं आणि केवळ राजघराणंच योग्य’ असं होऊ शकत नाही,’ असा बोचरा टोलाही त्यांनी हाणला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!