Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपल्या अखेरच्या भाषणात काय काय म्हणाले मोदी …

Spread the love

लोकसभेत आज पंतप्रधान मोदी यांचं भाषण झालं. १६ व्या लोकसभेचं हे अखेरचं सत्र आणि त्याचा आजचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे मोदींचं हे १६ व्या लोकसभेतलं अखेरचं भाषण होतं. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या कामांचा मोदींनी पुन्हा एकदा पाढा वाचला. ते म्हणाले, ‘आमच्या कार्यकाळात २१९ विधेयकं आली आणि त्यातली २०३ पारित झाली. आधारला याच सभागृहाने खूप मोठी ताकद दिली. नोटाबंदी, जीएसटीसारखे मोठे निर्णय घेतले. सामाजिक न्यायाच्या दिशेनेही या सभागृहाने पावले उचलली. आरक्षण कायदा आणला. समाजातल्या मागास वर्गासाठी कायदा आणला. देशाने गेल्या पाच वर्षांत डिजीटल जगात आपली जागा निर्माण केली. अवकाश संशोधनात जागतिक पातळीवर भारताला मोठं यश मिळालं.’
गेल्या पाच वर्षांत भारताच्या दृष्टीने एक खूप मोठा बदल झाला आहे तो म्हणजे जागतिक पातळीवर भारताची बाजू गांभीर्याने ऐकली जाते. कारण गेल्या तीस वर्षांत संसदेत पहिल्यांदाच पूर्ण बहुमताचं सरकार आलं. पूर्ण बहुमत असणारं सरकार ही आमची ओळख आहे. आतापर्यंत जागतिक पातळीवर भारताची ही ओळख नव्हती. त्यामुळे भारताचं खूप नुकसान झालं. गेल्या पाच वर्षांत देशाची ही ओळख वाढली आणि हे यश सव्वाशे कोटी जनतेचं आहे, ज्यांनी २०१४ मध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आणलं, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कामांचा लेखाजोखा आज संसदेत मांडला.
देशाचा आत्मविश्वास वाढला
भारत पाच ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जागतिक तापमानवाढीविरोधात भारताने मोठी लढाई लढली आहे. आज जगात सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल्यानंतर देशाचा आत्मविश्वास वाढला आहे, असं मोदींनी सांगितलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १५० वी जयंती
मानवतेचं मूल्य जपण्यासाठी भाजप सरकारने विशेष प्रयत्न केले असे सांगताना मोदी यांनी नेपाळ, मालदीव, बांगला देशाला केलेल्या मदतीचा उल्लेख केला. मानवतेच्या दृष्टीने भारताने हे काम केलं आणि जगासमोर आपली प्रतिमा उजळवली, असं ते म्हणाले. भाजप सरकारच्या कार्यकाळात आम्ही संसदेत संविधान दिवस साजरा केला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १५० वी जयंती साजरी केली, अशी माहिती त्यांनी दिली.
राहुल गांधी यांच्यावर टीका
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी आपल्या शेवटच्या भाषणातही टीकास्त्र सोडलं. मोदी म्हणाले, ‘आम्ही ऐकून होतो की भूकंप येणार, पण पाच वर्षं झाली कोणताही भूकंप आला नाही. लोकशाहीची शक्तीच इतकी मोठी आहे की तिने भूकंपही पचवला.’
गळाभेट घेणं आणि गळ्यात पडणं यात काय फरक असतो हे मला संसदेत पहिल्यांदाच कळलं. ‘आँखो की गुस्ताखियाँ’ पाहायला मिळाल्या .. अशा शब्दांत मोदींनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करणाऱ्या मोदींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचं मात्र आपल्या भाषणात कौतुक केलं. संपूर्ण सत्रात सभागृहात बसणारे नेते फार कमी असतात. खर्गे त्यापैकी आहेत, असे ते म्हणाले.

ते असेही म्हणाले …
पहिल्यांदा संसदेत आँखों की गुस्ताखियां पाहिली
गळाभेट आणि गळ्यात पडण्याचा फरक मला इथे कळला
मागील पाच वर्षांत आमच्या सरकारनं २०३ विधेयक संसदेत मंजूर केले आहे
आंतरराष्ट्रीय पातळीवर आता आंबेडकर आणि महात्मा फुलेंची जयंती साजरी केली जाते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!