जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनाच माझी अडचण : पंतप्रधान
२०१४ मध्ये देशातील जनतेने इमानदार आणि पारदर्शक सरकारसाठी मतदान केले. त्यानंतर गरिबांचे हक्क हिसकावणाऱ्या सगळ्यांनाच व्यवस्थेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. म्हणूनच देशातील प्रत्येक इमानदार व्यक्तीचा आज या चौकीदारावर विश्वास असून जे भ्रष्टाचारी आहेत त्यांनाच माझी अडचण वाटत आहे, असा टोला मोदींनी लगावला. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी त्याविरुद्ध सुरू असलेलं ‘स्वच्छता अभियान’ आता कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. हे अभियान येत्या काळात अधिक तीव्र करण्यात येईल. त्यासाठी देशाच्या या चौकीदाराला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले.
पंतप्रधान ‘स्वच्छ शक्ती २०१९’ या कार्यक्रमात बोलत होते. हागणदारीमुक्ती आणि स्वच्छतेचे लक्ष्य येत्या २ ऑक्टोबरपर्यंत गाठण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले असून या अभियानाला मोठा जनसहभाग मिळावा, असे आवाहन यावेळी मोदींनी केले. हरयाणातील विविध महत्त्वाकांक्षी योजनांची पायाभरणी यावेळी मोदींच्या हस्ते झाली.
पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प सोडताना महाआघाडीवर सडकून टीका केली. महाभेसळीत जे एकत्र आले आहेत त्या सगळ्यांनी तपास संस्था, न्यायालयं आणि मला धमकावण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र हा चौकीदार असल्या धमक्या आणि शिव्यांना कधीही घाबरणार नाही, असे ठणकावताना आता काही झाले तरी झुकणार नाही आणि थांबणार नाही, असा इशाराच मोदींनी दिला. महाभेसळीत (महाआघाडी) जितके चेहरे आहेत. ते सर्व लोक न्यायालय, सीबीआय आणि मोदींना शिव्या देण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचा आरोप मोदी यांनी केला.