महाआघाडी म्हणजे महाभेसळ : मोदींचा विरोधकांवर हल्ला
तिरुपूरमधील सभेत मोदींनी विरोधकांच्या एकीवर घणाघाती हल्ला केला. पंतप्रधान अपयशी ठरले, असं विरोधक म्हणतात. मग त्यांना महाआघाडी करण्याची गरज का वाटते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाआघाडी म्हणजे महाभेसळ असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. घराणेशाही पुढे नेण्यासाठीच महाआघाडी केली जात आहे. त्यांचा प्रयत्न तामिळनाडूसह देशातील जनता यशस्वी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.
मी पंतप्रधान म्हणून अपयशी ठरलो असं म्हणता, मग माझ्याविरोधात आघाडी करण्याची गरज का भासते, असा सवाल मोदींनी विरोधकांना विचारला. ते तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये बोलत होते. यावेळी मोदींनी काँग्रेससह, द्रमुकवर जोरदार टीका केली. मात्र त्यांनी राज्यातील सत्ताधारी अण्णाद्रमुकवर टीका न करता दक्षिणेत मित्र जोडण्याचा पर्याय खुला ठेवला. मोदींच्या सभेला तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी उपस्थित होते. यावेळी दोघांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन केलं. यानंतर हे दोन्ही नेते कोईम्बतूर विमानतळावरही भेटले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपा आणि अण्णाद्रमुकमध्ये आघाडी होण्याची शक्यता वाढली आहे.
राफेल डीलवरुन वारंवार लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी कडाडून टीका केली. संरक्षण क्षेत्रात काँग्रेसनं अनेक घोटाळे केले. मात्र भाजपानं भ्रष्टाचारमुक्त कारभार केला. संरक्षण क्षेत्राचा वापर काँग्रेसनं कायम त्यांच्या निकटवर्तीयांना कंत्राटं देण्यासाठी केला. जमिनीपासून आकाशापर्यंत त्यांनी भ्रष्टाचार केले. काँग्रेसच्या याच भ्रष्टाचारी वृत्तीचा परिणाम देशाच्या संरक्षण सिद्धतेवर झाला. संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला खीळ बसली, असा आरोप मोदींनी केला.