उत्तर प्रदेशात मित्र पक्षांची भाजपवर नाराजी
भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी
लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे. तस तशी राजकारणातली सुंदोपसुंदी वाढत चालली आहे. एनडीएतल्या मित्र पक्षांनीही भाजपाच्या नाकीनऊ आणले आहेत. उत्तर प्रदेशमधला भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या सुहेलदेवनं भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली आहे. सुहेलदेव भारतीय समाज(एसबीएसपी)चे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी भाजपाबरोबर असलेली युती तोडण्याचा इशारा दिला आहे.
राजभर म्हणाले, भाजपानं आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही त्यांच्याबरोबरची युती तोडू. सामाजिक न्याय समितीच्या शिफारशी 24 फेब्रुवारीपर्यंत लागू न केल्यास आम्ही भाजपापासून वेगळे होऊ. त्यानंतर आम्ही लोकसभेच्या 80 जागांवर उमेदवार उभे करू. आम्ही गरज पडल्यास भाजपाविरोधी असलेल्या सपा-बसपाबरोबरही जाऊ शकतो. त्यांच्याबरोबर चर्चाही सुरू आहे. 24 फेब्रुवारीनंतर भाजपाबरोबर कोणताही समझोता करणार नाही. तत्पूर्वी एनपीपीचे अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरोड संगमा यांनी भाजपापासून फारकत घेण्याचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी देशात भाजपा दंगली घडवेल, असं विधानही ओम प्रकाश राजभोर यांनी केलं होतं.