मोदी यांचा चंद्राबाबू नायडूंवर हल्लाबोल
सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपल्याची टीका
लोकसभा निवडणूक 2019चे मिशन डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जनसभांना संबोधित करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशमध्ये जाऊन चंद्राबाबू नायडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी चंद्राबाबूंनी सासऱ्याच्या पाठीत खंजीर खुपल्याची टीका मोदींनी केली आहे. चंद्राबाबूंनी स्वतःच्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते उद्या दिल्लीत फोटो काढण्यासाठी जात आहे. परंतु भाजपा आपल्या कार्यकर्त्यांच्या पैशानं कार्यक्रम करते, तर हे आंध्रच्या जनतेच्या तिजोरीतून पैसे काढून कार्यक्रम करत आहेत, असंही मोदी म्हणाले आहेत. ते गुंटूरमधल्या जनसभेला संबोधित करताना बोलत होते.
2014ला आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज दिलं. 2016मध्ये ते पॅकेज लागूही करण्यात आलं. त्यामुळे आंध्र प्रदेशला विशेष राज्यासारखीच मदत मिळाली. आंध्राच्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्ट स्वीकारून केंद्राचे आभार मानले होते. परंतु केंद्रानं दिलेल्या पॅकेजचा आंध्र सरकारनं योग्य वापर केला नाही. राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या टीडीपीनं नंतर यू-टर्न घेतला, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे. आमचा उद्देश स्वतःसाठी नव्हे, तर देशासाठी धन निर्माण करण्याचा आहे.
दिल्लीतल्या नावाजलेल्या कुटुंबीयांनी अहंकारात नेहमीच आंध्र प्रदेशातील नेत्यांचा अपमान केला आहे. त्यामुळेच एनटी रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली. टीडीपी नेत्यांनी काँग्रेसमुक्त भारतासाठी काम केलं पाहिजे, तेच आता काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचं काम करत आहेत. तुमच्या चौकीदारानं यांची झोप उडवली आहे. एक एक पैशाचा हिशेब द्यावा लागल्यावर मुख्यमंत्र्यांची झोप उडाली. आंध्राच्या लोकांनी आता तरी जागे व्हा, अशी टीकाही मोदींनी केली आहे.