Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोशल मीडियासाठी नवे नियम चिंताजनक

Spread the love

भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

भारतात व्हॉट्सअपचे २० कोटी यूजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. कंपनीचे जगभर एकूण १.५ अब्ज यूजर्स आहेत. संदेशाचा (मेसेजेस) माग घेणे म्हणजेच त्याच्या स्त्रोताचा उगम शोधण्यावर भर देण्याबाबत प्रस्तावित नियमांमध्ये उल्लेख करण्यात आला असून तोच चिंतेचा विषय असल्याचे, व्हॉट्सअप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी म्हटले आहे. फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअप मूलभूतरित्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. याचा अर्थ पाठवणारा आणि प्राप्त करणारा हे दोघेच संदेश वाचू शकतात. व्हॉट्सअपलाही ते संदेश वाचता येत नाहीत.

जगभरातील लोकांना जी गोपनीयता हवी आहे, ती प्रस्तावित बदलाला अनुरूप नाही. आम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्शन पुरवतो. पण नव्या नियमानुसार आम्हाला आमच्या उत्पादनाची पुर्नबांधणी करावी लागेल. अशा स्थितीत संदेश सेवा आपल्या सध्याच्या रूपात देता येणार नाही, असे वूग यांनी सांगितले. वूग यांनी नवे नियम लागू झाल्यानंतर भारतीय बाजारातून बाहेर पडण्याची शक्यता फेटाळली नाही. एंड-टू-एंड एनक्रिप्शन फिचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. मात्र, सोशल मीडिया प्लॅटफार्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियमाअंतर्गत त्याच्या सेवांचा दुरूपयोग आणि हिंसा पसरवणाऱ्यांपासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!